यात्रा ठिकाणी अन्न व्यावसायिकांनी नोंदणी प्रमाणपत्राशिवाय व्यवयाय करु नये-अन्न व औषध प्रशासन विभाग
MJ.NEWS SATARA

यात्रा ठिकाणी अन्न व्यावसायिकांनी नोंदणी प्रमाणपत्राशिवाय व्यवयाय करु नये-अन्न व औषध प्रशासन विभाग
सातारा दि. 23 : सातारा जिल्ह्यात येत्या हंगामात पार पडणाऱ्या विविध यात्रांच्या ठिकाणी अन्न व्यावसायिकांनी अन्न पदार्थ विक्रीकरीता आवश्यक नोंदणी प्रमाणपत्र घेऊनच आपला व्यवसाय करण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
यात्रेत येणाऱ्या भाविकांना स्वच्छ व निर्भेळ अन्न पदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न पदार्थ व्यवसायाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवावी, सर्व अन्न पदार्थ झाकून ठेवावेत, ग्राहकांना स्वच्छ व ताजे अन्न पदार्थच विक्री करावे, दिवसाअखेर उरलेले अन्न पदार्थ दुसऱ्या दिवशी पुन्हा वापरु नयेत, तसेच मुदतबाह्य अन्न पदार्थाची विक्री करु नये, आजारी व्यक्तींनी अन्न पदार्थाची हाताळणी करु नये, हॉटेल व्यावसायिकांनी पाण्याची भांडी रोजच्या रोज धुऊन स्वच्छ ठेवावीत व त्यामध्ये स्वच्छ पाणी भरुन ठेवावे, हॉटेल मधील कचऱ्याचा डबा झाकुन ठेवावा आणि नियमीत कचऱ्याची स्थानिक यत्रणेने दिलेल्या सुचनांनुसार विल्हेवाट लावावी,
भाविकांनी देखील आजारी असल्यास यात्रेमध्ये येण्याचे टाळावे, लहान मुलांना शक्य असल्यास यात्रेमध्ये आणू नये, भाविकांनी उघड्यावरील अन्न पदार्थ खाणे टाळावे, दुग्धजन्य पदार्थाचे सेवन २४ तासांच्या आत करावे, पॅकबंद अन्न पदार्थ खरेदी करताना त्यावरील मुदतबाह्य दिनांक बघूनच खरेदी करावे, एखाद्या अन्न पदार्थाच्या दर्जा बाबत शंका असल्यास तो अन्न पदार्थ खाऊच नये, त्याबाबत प्रशासनास माहिती देऊन सहकार्य करावे.
गुटखा, पानमसाला व तत्सम पदार्थांच्या विक्रीवर महाराष्ट्र राज्यात बंदी असल्याने कोणीही सदर पदार्थ विक्रीकरिता आपल्या जवळ अथवा आस्थापनेत ठेऊ नये अन्यथा प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत असून असे प्रतिबंधित पदार्थ विक्रीकरीता बाळगणाऱ्याविरुद्ध सक्त कारवाई करण्यात येईल, असेही अन्न व औषध प्रशासन कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.



